शाश्वत विकास चळवळीच्या जाणीव जागृती मोहिमेचा तिसरा आणि महत्वाचा महिला मेळावा मोठ्या उत्साहात रविवार दिनांक 28 जून रोजी संपन्न. कोरोना संबंधीची सर्व दक्षता घेत गावातील 35 बचत गटांच्या महिलांनी “गावच्या शाश्वत विकासामध्ये महिलांची भूमिका” या विषयावर कबीर मंदिर येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात अतिशय शिस्तबद्ध रीतीने मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
डॉक्टर अर्जुन कुंभार यांनी शाश्वत विकास ही संकल्पना आणि त्याची गरज विषद करत असताना वाढत्या जंगलतोड व प्रदूषणामुळे होत असलेली पर्यावरणाची हानी आणि त्यामुळे सातत्याने वाढणारे तापमान, त्यामुळे पृथ्वीवरील सर्व सजीवांना निर्माण झालेला धोका, त्यातून नामशेष होत असलेले हजारो प्राणी आणि पक्षी, आणि मानव जातीच्या अस्तित्वाला निर्माण झालेला धोका याबाबत सविस्तर माहिती दिली. येत्या दहा वर्षांमध्ये सरकारने आणि जनतेने पर्यावरणाचा होणारा हा जीवघेणा ऱ्हास थांबविण्यासाठी कठोर पाऊले उचलली नाही तर येत्या तीन-चार दशकांमध्ये इतर अनेक प्राण्यांबरोबर मानव जातही टप्प्याटप्प्याने नष्ट होईल असा गंभीर इशारा दिला.
शाश्वत विकास चळवळ ही पर्यावरणासह आरोग्य,शिक्षण, शेती, आणि उद्योग व्यवसाय या पाच महत्त्वाच्या मानवी गरजांच्या शाश्वत विकासावर भर देत असून संपूर्ण समाज आणि शासनकर्त्यांमध्ये यासंबंधी जाणीवजागृती निर्माण करण्याचे काम करत आहे. शाश्वत विकास ग्राम मडिलगे खुर्द येथे या पाच महत्त्वाच्या मुद्द्यांतर्गत ग्रामस्थांच्या सहभागाने अनेक उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
प्रा गौतमी कांबळे यांनी महिलांना जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून आपापल्या कुटुंबाचा विकास करून घेतला पाहिजे त्याच बरोबर उत्तम आरोग्य आणि दर्जेदार शिक्षण असेल तरच व्यक्तीचा आणि समाजाचा विकास होऊ शकतो असे प्रतिपादन त्यांनी केले.
श्री डी व्ही कुंभार यांनी कुटुंबांचा शाश्वत विकास झाला तरच कुटुंबामध्ये सुख आणि शांती ची खात्री देता येईल आणि कुटुंबातील न संपणारे कलह संपुष्टात येतील. यासाठी शाश्वत विकास प्रक्रियेमध्ये प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबाने सक्रिय सहभागी होण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.
डॉ जयंत कळके यांनी पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे होत असलेले हवामानातील बदल, दोन्ही ध्रुवावरील वेगाने वितळत असलेल्या हिमनगांमुळे वाढत चाललेली समुद्राची पातळी त्यामुळे किनारपट्टीच्या मानवी वस्तीला आणि समुद्रसपाटीला असलेल्या अनेक देशांना निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी जगातील सर्वच देशांनी तातडीची पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. शाश्वत विकास चळवळ ही यासंबंधीची व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी करत असलेले काम हे अत्यंत मौलिक असून ग्रामीण व शहरी भागातील सर्व स्तरातील लोकांनी या चळवळीत सहभागी होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
मेळाव्याचे स्वागत आणि सूत्रसंचालन महिलांतील तडफदार कार्यकर्त्या सौ. मंगल खापरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ सुवर्णा खोत यांनी केले. शाश्वत विकास चळवळीची भूमिका आणि ग्रामस्थांचा सहभाग याविषयी प्रतिपादन करत असताना चळवळीच्या पंचसूत्री बद्दल त्यांनी माहिती दिली. मडिलगे गावातील 35 गटांच्या कार्यकर्त्या या तडफदार रणरागिनी असून शाश्वत विकासात सक्रिय सहभाग घेतील अशी त्यानी ग्वाही दिली.
याप्रसंगी 85 वर्षाच्या तानुबाई करडे तसेच रेखा पाटील माधुरी अकोलकर आणि सरोज शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार वैशाली चौगुले यांनी मानले.
सुवर्णा खराडे यांनी गायलेली साने गुरुजींची प्रार्थना कार्यक्रमाचे पावित्र्य उंचावणारी ठरली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संगीता मांडे, स्मिता खोत, तेजश्री खापरे, सुरेखा खापरे आणि विमल खापरे यांनी केले.
चवळीच्या कार्यकर्त्यांनी गावच्या शाळेला भेट देऊन शाळेचे सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती बरोबर बैठक घेऊन शाळेचा शाश्वत विकास आराखडा तयार करण्यासंबधी मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment